नाशिक - कर्तृत्व दीप सोहळा - प्रबोधन संस्था
अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था महिला आघाडीतर्फे कर्तृत्व दीप सोहळा उत्साहात
१६० महिलांचा सहभाग; ‘उखाणा क्वीन २०२६’ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
नाशिक : अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था, महिला आघाडी नाशिक यांच्या वतीने ‘उखाणा क्वीन २०२६’ राज्यस्तरीय स्पर्धा व कर्तृत्वदीप सोहळा नुकताच माहेरघर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यास तब्बल ६०० महिलांची उपस्थिती लाभली.
नाशिक शहर अध्यक्षा चैताली अमृतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्षा प्राजक्ता पाखले, राष्ट्रीय कार्यवाह अंजली पाखले, प्रदेशाध्यक्षा स्मिता खैरनार तसेच महेंद्र शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नाशिक शहरातील १२ विभागांच्या कार्यकारिणी सदस्यांना पदभार प्रदान करण्यात आला.
चैताली अमृतकर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा उपस्थितांसमोर मांडत आगामी काळातील विविध उपक्रमांची दिशाही स्पष्ट केली.
‘गोदेची हाक’ उपक्रमाची घोषणा
कार्यक्रमात चैताली अमृतकर यांनी ‘गोदेची हाक’ या आगामी सामाजिक उपक्रमाची घोषणा केली. गोदावरी नदीचे स्वच्छता व निर्मळता जपण्यासाठी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, या अभियानात महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘उखाणा क्वीन २०२६’ची रंगतदार अंतिम फेरी
वटपौर्णिमेच्या निमित्ताने नाशिक शहरातील १२ विभागांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून निवड झालेल्या २४ विजेत्यांमध्ये ‘उखाणा क्वीन २०२६’च्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सुनंदाताई पाटील, रंजनाताई बोरा आणि अलकाताई दराडे यांनी केले.
या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली.
स्पर्धेतील विजेते :
🥇 प्रथम क्रमांक – अनिता कोठावदे
🥈 द्वितीय क्रमांक – शीतल बागड
🥉 तृतीय क्रमांक – केतकी कोठावदे
🏅 उत्तेजनार्थ – सोनाली सोनजे व अंकिता मालपुरे
🏆 विशेष प्रावीण्य – छाया कोठावदे
या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनासाठी नाशिक शहरातील १२ विभागांच्या विविध समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे १६० महिला कार्यकर्त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या उत्साहाने व नेटाने पार पाडल्या. त्यांच्या नियोजनबद्ध सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्याचा महिला आघाडीचा संकल्प या सोहळ्यातून अधोरेखित झाला.